आज राखी पौर्णिमा असे धामी
मोदभावे साजरी करू नामी
कां न दादा तू तरी अता यावे
ताई पूसे बंधुला विध्द भावे ।
लोप पावे अक्षुण्ण कळा आली
भाउराया च्या वदनी कऴा ल्याली
असा त्याला पाहुनी मनी खिन्न
भगिनि प्रेमळ ती होय ह्रद-विदीर्ण ।
काय भाऊ चिंतितो मना माजी
सांग कां ही दु:छटा तनू माजी
काय कांही हातून गुन्हा झाला
बोल ना रे कां धरी हा अबोला ।
बंधु कंठी होऊन रुध्द अंती
बंध मोडोनी रवे भाव येती
भाउ म्हणणे तू सोड मला ताई
तुला देण्यास्तव जवळि नसे काही ।
हाय मोठा जाहलो उगिच घोडा
पै कमविणे येइना कसा वेडा
बंधू तू गे कां तरी मला मानी
हेंच कोडे म्या पडे मनी ध्यानी ।
ह्या जगी गे सत्कार संपदेचा
आणि गरिबां दुत्कार कटू वाचा
सोय दीनांची कुणी ही करीना
आणि पीडेची तमा बाळगीना ।
सोड ताई तू तरी प्रेम भाव
तोड नाते हे, राख दुजा भाव
बोल ऐसे बोलून निघे वेगे
त्यास ताई थांबवावया लागे ।
भाउराया तू कसा वागतो रे
आजलागी तू मला नोळखी रे
जागजागी वंदिती लोक पैसा
त्यास गमवाया ठाकिती उसासा ।
असे त्यांहुन मी परी वेगळी रे
प्यावयाला इच्छिते प्रेम वारे
भाऊ मजला तू असे एकमेव
द्रौपदीचा रे जसा कृष्णदेव ।
अणि म्हणुनी विनविते भाउराया
घाल प्रेमाचे वस्त्र झांक काया
संपदा रे म्यां मनी मातिमोल
बोल प्रेमाचे चार रे अमोल ।
येई म्हणुनी तू झणि मम गृहाला
राखि बांधू दे तुझ्या ह्या कराला
प्रेमशब्दें होऊन प्रभावीत
बंधु गेला होतीच बहिण जेथ ।
आणि प्रेमें बांधिली तिने राखी
काव्य अपुले तो करी तिच्या राखी
भेट त्याची ती बघुनिया अमोल
खालि ओघळले अश्रु ते विलोल ।
शरद काळे
ग्वाल्हेर, 1956
चांगलाच उशीर झाला पोस्ट करायला
Friday, August 28, 2009
Subscribe to:
Posts (Atom)