Wednesday, December 3, 2008

खेळ

परमेश्वराची दोन लहान लेकरे
जशी गोजिरवाणी कोकरे
तशी पृथ्वी आणि आकाश
ब्रम्हांडाच्या प्रांगणात खेळत होती सावकाश
(कविता ऐका)

खेळता खेळता आकाशाने सहज
आपल्या जवळचा सूर्याचा पिवळा सागरगोटा
घासून घासून तापविला लाल आणि.........
त्याचा पृथ्वीला हळूच चटका दिला.....
रडत भेकत, कोकलत, किंचाळत..
पृथ्वी गेली परमेश्वर होता जेथ
आणि सांगितले त्याला आकाशाचे गा-हाणें
आकाशाला बोलाविले देवाने..........
दानवा, आपल्या बहिणिला धाकुल्या
कशास छळतोस कां दाखवितोस वाकुल्या
जा आत्ताच्या आत्ता तोंड काळं कर
प्लुथ्वी बाई, तुमि या बेटा माझ्या बलोबल

भोळे भाबडे आकाश.......
मावळला त्याच्या चेहे-या वरचा प्रकाश
काळ्या काळ्या ढगांचा कोळसा माखून
त्यानं खरंच कि घेतलं आपलं तोंड काळं करून
आणि गेला परमेश्वर होता जेथे,
बघाना माझे तोंड काळे झाले कि नाही ते...
परमेश्वर त्याच्या भाबडेपणा वर हसला
आपली थट्टा केली असं वाटलं आकाशाला
घळघळा रडू लागला बिचारा
पृथ्वी ओणवी होऊन झेली त्याच्या अश्रू धारा
परमेश्वर बघे त्यांचा बालिश खेळ सारा
अन् विसरून जाई सा-या विश्वाचा पसारा

शरद काळे
ग्वाल्हेर १९५७

Monday, November 3, 2008

इंद्रधनुष्य

म्हणती ज्याला इंद्र धनु

सप्तरंगी स्वर्गीय तनु
धनुष्य नच ते इंद्राचे
आहे परि रविरायाचे
कन्या त्याची
भू नावाची
अति लाडाची
खोड्या करते नित्य किती
मुळिच नसे त्याला गणती ।

गोरगोरा सोनुकला
भाऊ धाकुला चंद्र तिला
उगिच तया रॉकेट नखी
ओरबाडिते सुखा सुखी
स्पुतनिक लाडू
कधी नच कडू
आपण वाढू
बाळाच्या पाठी वरती
बोलुनि करते तसेंच ती

चंद्र बिचारा कळवळला
सूर्य तिला रागे भरला
अल्लड धरणी रुसरुसली
कोमल कलिका जणु सुकली
आदित्यांनी
मग मन धरणी
पाहिली करुनी
भू राणी परि नच हसली
अधिकच रुसली अन् फुगली ।

बसली असता अशी रुसुनी
स्पर्श कोवळा होय तनी
आश्चर्याने वर बघता
रागिणि झाली झणी स्मिता
तन गंगेचे
बहु रंगाचे
वक्रांगाचे
धनुष्य धरणीला दिसले
पित्याच्या करी धरलेले ।

सलिल सरींचे शर सुटती
ठेवताच त्या धनु वरती
भू राणी च्या रोखाने
वितळती तनुच्या स्पर्शाने
दोर नच दिसे
कसे घडतसे
बाण सुटतसे
अधीर होउनि भूमि पुसे
बाबा दोरि कशी न दिसे ।

किरण करांनी बाबांनी
ताणुनि धरली दोरि झणी
चपला दोरि लखलखली
टणत्कार करती झाली
क्षणांत दिसली
पुनहा लोपली
पृथ्वी भिजली
बाणांच्या वर्षावाने
अंग फुले रोमांचाने ।

मधुर चालला खेळ असा
भानु प्रफुल्लित करी रसा
शाम ढगांचे ते भाते
झाले अगदी पुरे रिते
इंद्रधनू ते
कशास उलटे
जगास दिसते
कारण ते प्रतिबिंब असे
घन-आरशी पांढ-या दिसे

शरद काळे
ग्वाल्हेर
१९५८

Tuesday, October 21, 2008

दीपावली

हे दिवे उजळले बघा किती
जणु नयन दिवाळी चे हसती ।
(कविता ऐका)

दीपावलि चे महत्व तैसे
नाताळाचे असते जैसे
म्हणुनि या सणाला साजेसे
स्वागत सगळे जन करताती ।।

शरद ऋतुच्या शुभ आगमनी
दीपावली ही येते सदनी
मुले मुली खोळतात मिळुनि
टिप-या झिम्मा दांडु-विटी ।।

प्रथम दिनी असते धन तेरस
तेवतात हे दीप मधु-सरस
ज्योत तयांची दक्षिण बाजुस
जणु यमराजां आरती करिती ।।

चतुर्दशी नरकाची नंतर
वधिला देवाने नरकासुर
चला विनाशु दुर्गुण सत्वर
तम नाशुनि उजळू ही धरती ।।

तिसरे दिवशी श्री चे पूजन
धन संपत्तिस पूजितात जन
मुले उडविती आनंदानं
फटाके नळे चंद्र-ज्योति ।।

बाल बालिका सगळे जमती
पक्वान्नाचा फन्ना करिती
नवे नवे हे खेळ खेळिती
दिपवाळीच्या नाना गमती ।।

भाउबिजेची मौज वेगळी
नटुनि थटुनि ताई ओवाळी
दादा मग ओवाळणि घाली
पाहुनि तया हसते मग ती ।।

रम्य दिवस हे दीपावलिचे
सुखविति मन जे सर्व जनांचे
माझ्या मनि कविता लिहिण्याचे
विचार म्हणुनि उद्भवती
शरद काळे
उज्जैन,१९५०

Thursday, October 2, 2008

आमुचे आजोबा


असे आमुचे आजोबा, असे आमुचे आजोबा
दमा, खोकला, काठी यांची संगत अजून नाही बा । असे आमुचे आजोबा

डोई वर भोवती चांदणे मधे विलसतो चांदोबा
चांदोबाला गिळतो काळा टोपीचा तो बागुलबा । असे आमुचे आजोबा
(कविता ऐका)

हिरवे हिरवे पिंगट डोळे, बघुनि आठवे वाघोबा
चेहेरा सूर्य जणू लखलखता सरळ न बघवे कोणा बा । असे आमुचे आजोबा

खड्या सुराने करिती पूजा गप्प ऐकतो खंडोबा
नैवेद्याची साखर नंतर देती करून खोळंबा । असे आमुचे आजोबा

वयास झाली ऐंशी वर्षे अजुनि आवडे मोरंबा
अचडं बचडं त्यांचं ऐकुनि मुखी हसूचा खुले डबा । असे आमुचे आजोबा

वाघा परि दरडावुन म्हणती असा बोलतो कोल्होबा
म्हणती शुभीला लाडोबा पण मला मात्र कां दांडोबा । असे आमुचे आजोबा

उघड्या अंगी टोपी घालुनि कुठे निघाले आजोबा
वेडा का तू, अनेक कामें म्हणून घाईत आजोबा । असे आमुचे आजोबा

चुके पईचा हिशेब, बेरिज करित काढती जन्म उभा
शाळा अन् मंडई, मंडळी ह्यात गुंगती आजोबा । असे आमुचे आजोबा

अमुचे अपुले पोट चिमुकले, पोट तयांचे पोटोबा
खाण्या पेक्षा स्वत: करुन घालण्यात रमती आजोबा । असे आमुचे आजोबा

अधिका-याचा मान मास्तर पण हाडाचे आजोबा
प्रेमाने शिकविती, छे¡ हाडे कुंबलती आजोबा । असे आमुचे आजोबा

त्यांच्या पुढती आमही वाकता, अश्रु रेटती आजोबा
त्यांचे गुडघे दुखणे लवकर थांबव ना रे हेरंबा । असे आमुचे आजोबा

शरद काळे
टाटानगर
१९७४

Monday, September 29, 2008

पतंग

हा पतंग रंगित पहा निळा
बागडे कसा अंबरी खुळा

वायु संगे वर वर चढतो
हिसका देता खाली येतो
सैल सोडिता मज धाववितो
लावितो मला फार हा लळा ।


उडतांना हा उंच खरोखर
गमतो मजला शतपट सुंदर
ईर्षेने खग उडती वरवर
पण थांब पतंगा सरे रिळा ।

पतंग अन् मी गच्ची वरती
घेउनि चकरी आणिक लई ती
उडवी मांजा लावुनि पुढती
लढवि ना कुणी पेच आगळा ।(कविता ऐका)

हवे पतंगा सम ते जीणे
क्षण दो क्षण बालका रमविणे
आणि स्वत: ही नभी बागडणे
वाहते सौख्य यांत खळखळा ।

शरद काळे
ग्वाल्हेर
१९५५

Thursday, September 25, 2008

आवडते आवाज



कधी नदीच्या लाटांचा खळखळाट जो पडतो कानी,
दु:ख विरुनिया जाई सारे मोद प्राप्ती हो ऐकोनी ।

लय गंभीर सागराचा हा कधी मनाला वेधितसे,
भरती आणि ओहोटी समयी फार मनोरम वाटतसे ।

प्रभात काळी कप-बशी अपुला गोड ध्वनी तो ऐकवुनी,
जणू सांगते प्राशन करण्या चहा, चला हो तुम्ही उठुनी ।

द्विज-गण अपुल्या कंठ रवे मज निद्रेतुनि जागे करतो
वाटा चुकलेल्या पथिकांना योग्य वाट तो दाखवितो ।

रवि उदयाच्या मंगल समयी, फिरावयाला जातांना
गात थरारे गति अवरोधित ऐकुनि मुरलीच्या ताना ।

कधी कोकिळा आम्र मंजिरीसी गुज गोष्टी करितात
चिमण्यांचे चे विविध मधुर स्वर कर्ण-पटां वर पडतात ।
(कविता ऐका)

डुबुक डुबुक आवाज येतसे घागरीचा विहिरी वरती
जणू काय घट-पाण्या च्या भेटीने मोदा ये भरती ।

कधी कधी एखादा साधू करी घेवोनि एकतारी
प्रात:काली भजन गावूनि दु: मनाचे दूर करी ।

आगगाडी सुरु होण्या समयी वाफेचा जो ध्वनि निघतो
जणू काय वीराचा बाहू रण-त्वेषाने फुरफुरतो ।

भानु-बिंब मावळले होई वातावरण कसे कुंद
देवळातला मधु घंटा-रव तन मन माझे करी धुंद ।

रातराणिचा गंध दरवळे, माउली कुणी तान्ह्याला,
अंगाई म्हणुनिया निजविते भारुन टाकी स्वर मजला ।

जगात ह्या सर्वत्र कोलाहल पडतो कानी
त्यातलेच मम आवडीचे स्वर निवेदिले हो तुम्हां मी ।

शरद काळे
उज्जैन,१९५०

ऋतुरंग प्रस्तावना


ऋतुरंग प्रस्तावना
ऋतुरंग ह्या डॉक्टर शरद काळे ह्यांच्या काव्य संग्रहाचं हे मल्टिमीडिया सादरी करण आहे. हा काव्य संग्रह पुस्तक स्वरूपांत, कल्पना मुद्रणालय पुणे ह्याच्या तर्फे, 1997 साली मुद्रित होवून 27 डिसेंबर,1998 साली जेष्ठ कवयित्री श्रीमति अनुराधा पोतदार ह्यांच्या हस्ते प्रकाशित झाला. त्या वेळी श्री ना.स. इनामदार, हे ऐतिहासिक संशोधक आणि कादंबरीकार, ज्यांनी ह्या काव्य संग्रहाला प्रस्तावना ही लिहिली आहे, उपस्थित होते. त्यांनी ह्या कार्यक्रमाचं सभापतित्व ही स्वीकारलं होतं . तसेंच प्रसिध्द कवयित्री सौ. हेमा लेले, ह्यांनी ह्या काव्य संग्रहाचं रस ग्रहण केलं .
ह्या मल्टीमीडिया सादरी करणांत ह्या संग्रहातील सर्व कविता आहेत. ह्या संग्रहाचं वर्णन करायचं झालं तर
संग्रहाचया नावांतच ते आहे. जीवनातील विविध रंग दर्शवणा-या ह्या कविता ऋतुरंग ह्या नावाला सार्थ करतात. मराढी माणसाच्या खास अशा सांस्कृतिक चळवळी मधून मातृभाषा जपण्याचा जो प्रयत्न बृहन्महाराष्ट्रीय सतत करीत असतो त्याचेच प्रत्ययीकरण म्हणजे डॉ. शरद काळे ह्यांचा हा काव्य संग्रह आहे .
ह्या संग्रहातील कविता कांही हलक्या फुलक्या असल्या तरी काहीं गंभीर आणि सार-गर्भित आहेत जीवनाचंच नव्हे तर जीवनाच्या शेवटाचं ही दर्शन ह्या कविता घडवितांत. पेशाने डॉक्टर पण मन कविचं. टाटानगर च्या मेडिकल कॉलेजांत प्राध्यापक पण त्यातूनही कविते साठी वेळ काढणारा. “दवडला जन्म
शब्द वेचण्यात रोग निदानार्थ वेळ नाही “अशी प्रांजळ कबूली देणारा शब्दवेडा डॉक्टर .उघड्या डोळ्यांनी कविचा मृत्यु बघत, “आलिया भोगासी सावे सादर “ असे म्हणणारा. निर्जीवांतही सजीवाच्या भावना ओतणारा आगळा वेगळा कवि.
लहानपणा पासून कवितां करायचं अत्यंत वेड अन् त्या कविता बहीण भाऊ आई वडिल ह्यांना ऐकवून त्यांच्या पसंतीचं शिक्का मोर्तब झाल्या खेरीज चैन कसं ते पडायचं नाही. कवितेंत येणा-या उपमा अगदी रोजच्या व्यवहारातल्या पण उपयोग नवीन कि वाटावं अरे हे आपल्याला कां बरं सुचु नये .

पोलकं कवितेतल्या प्रौढ कुमारिकेची व्यथा दर्शविणा-या ह्या ओळी पहा,
“ हिरवी स्वप्ने पहात गपचिप जगतं
एखाद्या दिवशी अचानक बिथरतं
अन् हळदी च्या अतृप्त इच्छेने विरतं.”

किंवा कवि अन् वेदना ह्यांचं कसं अजोड नातं आहे ते दर्शविणा-या ह्या ओळी.
अन् असह्य जवळिक ही
आंत सूर्य कवि अंतर
काष्ठा सम कवि देहा
ज्वलन हेच गत्यंतर

अन् त्या वेदना कशा सोसायच्या तर

विपदांचे जहर जरी
लिहिले असले दैवी
संजीवक ते ठरण्या
मीरेची वृत्ती हवी
अन् ह्याच मीरेच्या वृत्तीनं जीवन अन् मृत्यु दोनही प्रसंगांना सामोरं जातांना जे कांहीं उमटले ते हे ऋतुरंग .