Monday, March 16, 2009

पाणी

ह्या कवितेस पाणी ह्या विषयावर आयोजित केलेल्या काव्य स्पर्धेत 1952 साली प्रथम पारितोषिक मिळाले होते. कल्पना अशी आहे कि कवि पाण्यात पडलाय अन त्याला पोहता येत नाही तर शेवटचा प्रयत्न म्हणून तो पाण्याचीच स्तुति करतो अन् प्राण वाचविण्यांत यशस्वी होतो .

बुड बुड शिरते मौजेने, जल नाकां अन् तोंडात
जणु भू वरि येउनि देवी जल भरते नर भांड्यात
वाचवा मला हो कविच्या त्या हाका जन तांड्यात
मावळती, कोणि न पुढती परि येती त्या षंढांत
कवि बोंबा मारुनि थकला
धैर्यास आपुल्या मुकला
डोही अन् कुंथुन थुकला
शेवटची आशा म्हणुनी पाण्यास लावि कवि लोणी ।

अपमान तुझा बा पाण्या अत्यंत आजवर झाला
गुण वर्णन तुझे कराया कवि एक पुढे नच आला
दुर्लक्ष तुझे जे झाले तू राग मनी ठेवियला
अति वर्षण महा पुराने कधि मधि व्यक्त ही केला
लिहिण्यास जला तव करणी
उचलली जरी ही झरणी
तू येतो अमुच्या नयनी
अमुच्यात तूच नसल्याने ओळ ही येइना ध्यानी ।

गर्दभास तू जर नसता एकनाथ देते काय
मारून बाण त्वेषाने काढते राम तरि काय
लक्षुमिने धनिकां सदनी मग भरले असते काय
रण य़ोध्दा तरवारीने शत्रूस पाजिता काय
अन् प्रणयी नव युग्माला
करता ही नसत्या आल्या
उन्मादाने जल लीला
मग कसे सकाळी असते ढोसले चहाचे पाणी ।

दुग्धांत नित्य गवळ्याने मग काय मिसळले असते
सोनार दागिन्यां वरती सोन्याचे काय चढवते
चांगल्या गोल मोत्याला मग काय पारखी म्हणते
जीवन अफाट हे सारे बुडबुडा कशाचा ठरते
कोलंबस नसता थोर,
तेनसिंग एक मजूर,
गाजता न जगि ह्या फार
अन् कसे मुखाला सुटते पक्वान्न पाहुनी पाणी ।

पाणपोई यशवंतांची मग कशी गाजली असती
तोंडाचे ते पळण्याची वेळ ही ठेपली नसती
ह्रदयाची अति दुःखाने स्थिति काय जाहली असती
साहित्यिक झाले नसते राहता कोरड्या दौती
कवि विनवि असा पाण्याला
तो जवळ ओंडका आला
जणु हात जलाने दिधला
झणि कविच्या नयनी दाटे ते कृतज्ञते चे पाणी ।

शरद काळे
ग्वाल्हेर

2 comments:

Sonal said...

मस्तच आहे! झकास

Abhijit Galgalikar said...

सही आहे ..