Friday, August 28, 2009

राखी पौर्णिमा

आज राखी पौर्णिमा असे धामी
मोदभावे साजरी करू नामी
कां न दादा तू तरी अता यावे
ताई पूसे बंधुला विध्द भावे ।

लोप पावे अक्षुण्ण कळा आली
भाउराया च्या वदनी कऴा ल्याली
असा त्याला पाहुनी मनी खिन्न
भगिनि प्रेमळ ती होय ह्रद-विदीर्ण ।

काय भाऊ चिंतितो मना माजी
सांग कां ही दु:छटा तनू माजी
काय कांही हातून गुन्हा झाला
बोल ना रे कां धरी हा अबोला ।

बंधु कंठी होऊन रुध्द अंती
बंध मोडोनी रवे भाव येती
भाउ म्हणणे तू सोड मला ताई
तुला देण्यास्तव जवळि नसे काही ।

हाय मोठा जाहलो उगिच घोडा
पै कमविणे येइना कसा वेडा
बंधू तू गे कां तरी मला मानी
हेंच कोडे म्या पडे मनी ध्यानी ।

ह्या जगी गे सत्कार संपदेचा
आणि गरिबां दुत्कार कटू वाचा
सोय दीनांची कुणी ही करीना
आणि पीडेची तमा बाळगीना ।

सोड ताई तू तरी प्रेम भाव
तोड नाते हे, राख दुजा भाव
बोल ऐसे बोलून निघे वेगे
त्यास ताई थांबवावया लागे ।

भाउराया तू कसा वागतो रे
आजलागी तू मला नोळखी रे
जागजागी वंदिती लोक पैसा
त्यास गमवाया ठाकिती उसासा ।

असे त्यांहुन मी परी वेगळी रे
प्यावयाला इच्छिते प्रेम वारे
भाऊ मजला तू असे एकमेव
द्रौपदीचा रे जसा कृष्णदेव ।

अणि म्हणुनी विनविते भाउराया
घाल प्रेमाचे वस्त्र झांक काया
संपदा रे म्यां मनी मातिमोल
बोल प्रेमाचे चार रे अमोल ।

येई म्हणुनी तू झणि मम गृहाला
राखि बांधू दे तुझ्या ह्या कराला
प्रेमशब्दें होऊन प्रभावीत
बंधु गेला होतीच बहिण जेथ ।

आणि प्रेमें बांधिली तिने राखी
काव्य अपुले तो करी तिच्या राखी
भेट त्याची ती बघुनिया अमोल
खालि ओघळले अश्रु ते विलोल ।

शरद काळे
ग्वाल्हेर, 1956

चांगलाच उशीर झाला पोस्ट करायला

1 comment:

Pranjal said...

hello Asha Ji...
kya kahun aapki kritiyon ke bare me.. ek sachhaee ye hai ki mujhe aapki bhasha nhi aati... lekin aashchary...usse bhi badi ek sachhaee yah bhi hai ki adbhut hai aapki rachna, uske bhaw, aur srvopari vyanjan ke sabhi rupon ko vishishtata prapt karati aapki tukbandi...
yun lag raha hai ki shabd vyarth hai .. bas itna hi kah dun to kafi hai ki.. mai jo is bhasha ke liye nipat, anpadh, ganwar hun.. mai bhi aahladit huee aapko padhkar...
DHANYAWAD he MAHADEVI.....!!!